Thursday, July 9, 2015

                  पाऊस आणि प्रसारमाध्यम 
   

       पाऊस, ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पहात होतो त्याचे शेवटी आगमन झाले. आपल्या सर्वांसारखेच  प्रसारमाध्यमं  सुद्धा पावसाची वाट पाहत असतात. 'पाऊस हा प्रसारमाध्यमांचा सर्वात जवळचा मित्र आहे ',असे शाळेच्या इंग्रजी पुस्तकात वाचलेलं आठवतं कारण तो भरपूर प्रकारच्या बातम्या निर्माण करून प्रसारमाध्यमांची भूक भागवतो. 
  
    पाऊस किंवा  मान्सून कधी येणार यापासून त्याची सुरवात होते. प्रत्येक न्यूज चैनल / दैनिक आपापल्या परीने मान्सूनच्या आगमनाच्या तारखेचा अंदाज बांधतात. आपापल्यापरीने अंदाज बांधण्याचे कारण पूर्वानुभवावरून  सामान्यांप्रमाणे   त्यांचा ही हवामान  खात्यावर विश्वास उडाला असावा. अखेर सर्वांच्या तारखा व अंदाज चुकवून मान्सून भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर येउन आदळतो. (पावसाचे भारतात आगमन ही एक बातमी) याला आता मुंबई गाठायला किती दिवस /तास लागणार, मान्सून मुंबई गाठण्यापूर्वी महानगरपालिका प्रशासन किती तयार आहे? , मिठी नदीतून किती गाळ काढला आहे? (कागदावर तरी) यावर पेपारांतले अंक व चैनलवरचे चर्चासत्र रंगतात. एकदाचा तो मुंबई गाठतो आणि सेटल व्हायला बघतो तोच बातम्यांचा  भडीमार सुरु होतो. 

हिंदमाता,परेळ, मिलनसबवे जलमय, मिठी नदीची पातळी धोकादायक पातळीपेक्षा वर, हायटाईडमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मुंबईची लाइफलाईन कोलमाडली (रोज म. रे त्याला कोण रडे), शहरात मलेरिया आणि कवीळची  साथ याच बातम्या जराही बदल न होता मी गेले कित्येक वर्षे वाचत आलो आहे . काही वर्षी त्याला यायला फार उशीर होतो व कधी तो अगदीच लवकर हजेरी लावतो (ही सुद्धा बातमी) कधी पाच-सहा दिवस सलग पडतो तर कधी एक दिवस आड त्याचा क्रम असतो तर कधी आठवडाभराची सुट्टी टाकून पुणे, नाशिक अशी सहल करून येतो. हा मान्सून अडीच-तीन महिने प्रसारमाध्यमांची भूक भागवून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आश्वासन देऊन निघून जातो. 
  
संकेत सुभेदार  

No comments:

Post a Comment